Wednesday, 1 July 2020

अभंग - पंढरीचे आई

पंढरीचे आई | विठू रखूमाई |
सावळे विठाई | पांडुरंग ||

तुळशीचा हार | भाळी बुक्का काळा |
दिसे लडिवाळा | पांडुरंग ||

चंद्रभागेतिरी | उभा विटेवरी |
कर कटेवरी | पांडुरंग ||

टाळ चिपळ्यांचा | गजर दाराशी |
बोल तू भक्तांशी | पांडुरंग ||

तुझ्या भेटीसाठी | निघे वारकरी |
तृप्त होती सारी | पांडुरंग ||

भूक नि तहान | सारे विसरती |
विठू नाम घेती | पांडुरंग ||

वर्तन हे शुद्ध | वाईटाशी युद्ध |
करेल तो सिद्ध | पांडुरंग ||

सौ.जया नेरे
नवापूर







Wednesday, 10 June 2020

बालकविता- फुलराणी

फुलराणी

बागेमध्ये होणार आज
नाच आणि गाणी
फुलांना भेटावयास
येणार आहे फुलराणी

लाल पिवळ्या गुलाबाला
उठवले सर्वांनी
सांगायची होती त्यांना
फुलराजाची कहाणी

ऐटीत येत जास्वंदाने
केले नृत्य छान
नाचता नाचता मधेच तो
हलवत होता मान

मोगरा जाई जुईचा मात्र
थाट होता मोठा
त्यांच्याकडे होता खूप
अत्तराचा साठा

चाफा मात्र नेहमीप्रमाणे
बसला होता गुपचूप
त्यामुळे सारेच त्याला
चिडवत होते खूप

पाहून सा-यांना खूश
सुखावली फुलराणी
डबडबले डोळे तिचे
थरथरली वाणी

गुण्या गोविंदाने रहावे
स्वप्न होते तिचे
दुःख विसरून सारेच
हसू चेहऱ्यावर दाखवायचे


सौ.जया नेरे





Thursday, 4 June 2020

बालकविता- ढग पावसाळी

ढग पावसाळी

आले आले बघा
ढग पावसाळी
पाण्याने भरण्या
नदी,नाले,तळी

काळ्याभोर रंगाचा
घालून सदरा
धावतो पळतो
येतो जेव्हा धरा

जेव्हा जेव्हा त्याचा
डाव सुरू होतो
क्षणात सूर्याचे
डोळे तो झाकतो

जमलीत सारी
कराया विचार
कुठे जायचे कसे
सांगा सांगा लवकर

पाण्याच्या घागरी
निघाले घेऊन
एकेका घागरीने
केले अंगणी शिंपण

रिमझिम सरींनी
झाले अंगण ओले
ये रे ये रे पावसा हे
गाणे सुरू झाले

सौ.जया नेरे

Thursday, 28 May 2020

मोकळा श्वास- लघुकथा


सौ.जया नेरे
                          नवापूर जि.नंदुरबार
                            9423918363

           मोकळा श्वास

एक-दोन दिवसांपासून संजीवनीला असं जाणवत होत की मिनू खूप उदास उदास राहतेय. नीट जेवत नाही की अभ्यासाला ही तिचे लक्ष लागत नाही.आपल्या रूममध्ये लोळत पडलेली असते.संजीवनीला वाटायचं की होईल व्यवस्थित दोन दिवसात.परंतु तिच्या वागण्यात अजिबात बदल होत नव्हता.तिला आपल्या मुलीची चिंता वाटू लागली.का असं वागतेय मिनू.काय होत असेल हिला.संजीवनीने तिला जवळ बोलवले.तिच्या डोक्यावरुन हात फिरवला.मांडीवर बसविले व हळूवार तिला विचारले ,अग मिनू,तुला काय होतयं बाळा,का एवढी उदास असतेस,नीट जेवत ही नाही की अलिकडे तू पुस्तक ही उघडले नाही.सांगशील का बच्चू आपल्या आईला.मिनूने आईचे शब्द ऐकले आणि तिला रडूच कोसळले.साठवलेले अश्रू घळघळ वाहू लागले. आईच्या कुशीत मनसोक्त रडून झाल्यावर मिनू हळूहळू आईला सांगू लागली.सांगतांना कसे सांगावे या संभ्रमात ती होती.
मिनू म्हणाली,आई ऐक ना ,मला का असं होतयं,काय झाल असेल गं मला,मी जिवंत राहिल ना गं. मिनूचे बोलणे ऐकून संजीवनी जास्तच घाबरली.काय झालं असेल माझ्या मिनूला.
संजीवनीने मिनूला छातीशी घट्ट धरले व तिच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागले. वाहणारचं ना आईला मुलांच्या डोळ्यातील अश्रू जास्त कमजोर करतात.
अगं मिनू सांग तरी तुला काय होतयं.
आई ,मला ना लघवीच्या जागेतून रक्त येतयं,मी आता मरणारचं आहे बघ.माझं पोट ही खूप दुखतयं ग आई,कंबर तर तुटेलच असं वाटतयं. खरचं मी मरणार आहे ना आई,सांग ना गं !
संजीवनीला आता हायसं वाटलं की मिनूला काही सिरियस झाले नाही.
संजीवनीने मिनूला सांगितले अग मिनू एकदा हस बरं.अग वेडी तुला काही झालं नाहीये.अगं असं प्रत्येक मुलीला वयात आल्यानंतर होत असतं.
मिनूने लगेच विचारले,'अगं आई,मुलगी वयात येणं म्हणजे काय असतं गं,सांग ना.
संजीवनीने तिला समजेल अशा भाषेत सांगितले की मुलगी १२-१३ वर्षाची झाली की तिला असा त्रास होतो तेव्हा मुलीचे वयात येणे म्हणतात.म्हणजे स्री मध्ये जी मुख्य लक्षणं हवीत ते म्हणजे मासिक पाळी सुरू होणे,तुला जो त्रास आता होतोय ना त्यालाच मासिक पाळी असे म्हणतात.
बघ मिनू तुला आठवतं का आजी तुम्हाला म्हणायची आई जवळ जावू नका तिला कावळा शिवलायं. अगं मिनू,ते कावळा शिवणे होते ना,तेव्हा मला ही असाच त्रास होत होता. त्या काळी मुलांशी वा इतरांशी या बाबत मोकळेपणे बोलले जात नव्हते.आणि या काळात स्रिला कशाला ही शिवू देत नव्हते.पण बाळा आता हे सगळं बदललयं, तशी परिस्थिती आता राहिली नाही.
आणि हो गं माझचं चुकलं ,कामाच्या धावपळीत तुला याबाबत सांगायचे राहुन गेले,नाही तर तू घाबरले नसते.संजीवनीला तिची ही चुक चटकन लक्षात आली की आपण जर आधीच मिनूला सर्व माहिती सांगितली असती तर मिनूला असा शॉक बसला नसता.
संजीवनीने ठरवलं की मिनूला याबाबतीत सर्व माहिती द्यायची.
एके दिवशी दोघं मायलेकी फिरायला निघाल्या व रस्त्यात संजीवनीने मिनूला मासिक पाळी चक्र कसे सुरू असते या विषयी माहिती सांगितली. आणि अशा वेळी कशी काळजी घ्यायची,आहार काय घ्यायचा,आपल्या शरीराची काळजी कशी घ्यायची,यातून धोके काय आहेत.तसेच पॕडचा वापर कसा करायचा व स्वच्छता कशी ठेवायची या बाबतीत सखोल माहिती दिली.
हे सर्व ऐकून मिनूच्या मनावर जे ओझे होते ते कमी झाले.ती मोकळेपणाने राहू लागली.प्रत्येक गोष्ट ती आपल्या आईशी शेअर करू लागली.त्या दोघींच्या हे लक्षात आले नाही की कधी त्या जिवलग मैत्रीणी झाल्या. मिनू या सर्व गोष्टी आपल्या मैत्रिणींशी शेअर करू लागली.
एक दिवशी संजीवनी मिनूच्या शाळेत गेली,तेथील शिक्षिकांशी संजीवनी या बाबत सविस्तर बोलली.शिक्षिकांच्या ही बाब गंभीर आहे व या विषयावर आपण मार्गदर्शन पर तासिकेचे नियोजन केले पाहिजे हे लक्षात आले,त्यांनी शाळेत महिला मेळाव्या सह किशोरींचा मेळावा घेतला त्यात लेडीज डॉक्टरांना आमंत्रित केले.डॉक्टरांनी  किशोरींना मासिक पाळी,आरोग्य,स्वच्छता,आहार या बाबत स्क्रीनवर पी.पी.टी.च्या साह्याने मार्गदर्शन केले.महिलांनाही त्यांच्या आरोग्यविषयक सवयी जाणून घेवून मार्गदर्शन केले.
सर्व किशोरी त्यानंतर फुलू लागल्या ,डुलू लागल्या,फुलपाखराप्रमाणे स्वच्छंद वावरु लागल्या,मोकळा श्वास घेऊ लागल्या.


सौ.जया नेरे
नवापूर जि.नंदुरबार
9423918363

Thursday, 14 May 2020

कविता- शंभूराजे

शंभूराजे

असे दणकट पिळदार शरीर
रूप त्यांचे देखणे रूबाबदार
शिवबाचा असे वीर पूत्र....हो जी

१४ मे १६५७ साली
गर्दी पुरंदर किल्ल्यावर दिसली
सईच्या उदरी राजबिंडा जन्मला...हो जी

होते शंभू तयाचे नाव
गोळा झाला तिथे सारा गाव
झाले कौतुक सा-यांना हो...जी

राही शिवरायांच्या सोबती
पाहिली डोळ्यांनी राजनिती
जाणली सारीच युद्धनिती हो...जी

बालपणीच मातृविना झाला पोरका
दाटला सर्वांना हुंदका
केली दुधाची उधारी हो...जी

केला जिजाऊंनी संस्कार
घडविला शिवबा परी शंभू बाळ
जुळवली स्वराज्याची नाळ हो...जी

शंभूराजे होते साहित्यिक
साहित्याचे त्यांना भारी कौतिक
संस्कृत भाषेचे उत्तम जाणकार हो...जी

अनेक ग्रंथांचे केले लेखन
कैक भाषांची होती जाण
विद्याविशारदचा होता बहुमान हो...जी

स्वभावाने होता निर्मळ
बसली स्वकियांच्या फितूरीची झळ
शत्रूने साधला त्यांच्यावर डाव हो....जी

रणागणांत होता शेर
जरब होती त्याची सर्वदूर
नाव ऐकताच शत्रू कापे थरथर

असा कुशलयोद्धा,परक्रमी राजा
अजेय वीर,छावा,धर्मवीर हो...जी
नमन स्वराज्यरक्षणकर्त्याला हो..जी

सौ.जया नेरे
नवापूर



Wednesday, 6 May 2020

बालकविता- नकोशी झाली सुट्टी

नकोशी झाली सुट्टी

नकोशी झाली सुट्टी
आला मला कंटाळा
मुलांनी गजबजलेली
आठवते मला शाळा

अंक आणि अक्षरांचा
भरलेला तो फळा
पुस्तकांच्या संगतीने
लागे वाचनाचा लळा

काळ्याशार फळ्यावर
पांढऱ्या खडूची संगत
मधल्या सुटीत बसलेली
आठवतेय मला पंगत

घंटेची ती किणकिण
प्रार्थनेची सुंदर धुन
ऐकाविशी वाटतेय मला
ती गाण्यांची गुणगुण

कधीपासून मित्रांसोबत
रंगला नाही खेळ
करमेच ना त्याशिवाय
जात नाही वेळ

बाईच्या प्रेमाला आज
झालो आम्ही पारखे
शाबासकीने पाठीवर
हात फिरवायच्या सारखे

डोळा चुकवून सर्वांचा
शाळेत जाऊन यावे
वाटे एकदा तरी तिला
डोळेभरून पहावे

सौ.जया नेरे
नवापूर

Thursday, 30 April 2020

बालगीत- देवबाप्पा

देवबाप्पा

देवबाप्पा का रे
एवढा नाराज?
खेळायला कसा
येत नाही आज?

नको नको बाबा
घरातच राहू
कोरोनाशी लढा
आपणही देवू

शाळेलाही सुट्टी
नाही अभ्यासाला
घरीच बसून
शिकू दोघ चला

सारे सांगतायं
हात स्वच्छ धुवा
बाहेर जातांना
तुम्ही मास्क लावा

देवबाप्पा दे तू
कोरोनाशी लढा
असेल का रे तो
तुझ्याहून चढा?

कोरोना संपव
घरी जाता जाता
लॉकडाऊनने
कंटाळलो आता

सौ.जया नेरे
नवापूर जि.नंदुरबार






Friday, 24 April 2020

बालकविता- झोका


झोका
झोका जाई वरवर
वारा येई भरभर
चल ताई आपण
झोका झोका खेळू
छान छान गाणे
वा-यासंगे बोलू
आळीपाळी दोघं
झोक्यावर बसू
वर जाता झोका
येते मला हसू
गूं गूं होते कसे
पोटामध्ये माझ्या
गुदगुल्या होताच
येई मला मजा
आंब्याच्या वाडीत
बांधलाय झोका
झाडावरील पक्षी
मारतोय हाका
काऊ आणि चिऊ
सारे तेथे जमले
त्यांच्या सोबत कसे
खेळण्यात रमले
सौ.जया नेरे

Thursday, 23 April 2020

कविता- वाचवू वसुंधरेला

२२ एप्रिल - जागतिक वसुंधरादिना निमित्त-
वाचवू वसुंधरेला

सौंदर्य वसुंधरेचे खुलविण्या
वृक्ष,वेली यांचे करू रक्षण
वाताहात होईल स्वतःची
जर होईल झाडांचेच भक्षण

स्वच्छ,निर्मळ,शुद्ध हवा
गरज आहे तिची प्रत्येक देहा
प्रदुषणाचा होतोय भडिमार
कृत्रिमतेचा सहारा घेतोय पहा

नसेल वृक्ष प्रत्येक घरीदारी
तर घ्यावी लागेल श्वासाची उधारी
सिमेंटचे  हे जंगल वाढवून
मानवा स्वतःचा आहे तूच शिकारी

वसुंधरे दिनी करू संकल्प सारे
एक झाड लावू जगवू त्याला
वसुंधरेला वाचवण्याचा हा
समजेल मुलमंत्र ज्याला


सौ.जया नेरे

बालकविता- वेडा आंबा

वेडा आंबा
आंब्याच्या झाडावर
होते आंबे सात
त्यातील एकाशी कुणी
करत नव्हते बात

एकटाच बसायचा
एकटाच खेळायचा
इकडे नि तिकडे
एकटाच पळायचा

स्वभावाने वेंधळा
होता जरा बावळा
सर्वांमध्ये होता तो
थोडाफार वेगळा

रंग नाही रूप नाही
होता वेडा वाकडा
डोळे होते तिरळे
होता जरा जाडा

एकदा झाडावरच
लागला तो रडायला
कुणीतरी दगडाने
लागले पाडायला

राजू म्हणत होता
आईबाबा जरा थांबा
आवडला होता त्याला
वेडा तोच आंबा

वेडा आंबा आज होता
खूपच खुशीत
कारण जावून बसला तो
राजूच्या कुशीत

सौ.जया नेरे

कविता- आयुष्याचे पुस्तक

जागतिक पुस्तकदिना निमित्त -
आयुष्याचे पुस्तक

आयुष्याचे पुस्तक
वाटले मज कठीण
अक्षरांच्या गुंतेची
जर घट्ट होती वीण

एक एक पानांचा
सरकत होता दिन
वर्ष वर्ष संपे तरी
संपत नव्हता शीण

दुःखाची आकडेवारी
दिवसेंदिवस वाढली
गोळाबेरीज करतांना
सारी बाकीच काढली

अधिक उणे करण्यात
बसत नव्हता ताळा
महागाईमुळे खर्चावर
कसा बसेल आळा?

आयुष्याच्या पुस्तकाची
संपत आली पाने
संपले नाहीत अजुनही
सुखदुःखाचे गाणे

सौ.जया नेरे












Thursday, 16 April 2020

कविता- तुझे बोट धरून

तुझे बोट धरून

तुझे बोट धरून
पहिले पाऊल टाकले
बाबा तुझ्या कडून मी
मधाचे बोट चाखले

तुझ्या डोळ्यानीच मी
जग सारे पाहिले
माझ्या सुखासाठी बाबा
जीवन स्वतःचे वाहिले

उपडा होऊन माझ्या साठी
व्हायचासं तू घोडा
कधी पडायचासं तर
कधी रडायचास थोडा

चोकोबार,आईस्क्रीम,
आणायचास घरी
फिरायला न्यायचासं
थकत असला तरी

सांग ना बाबा मी पण
कधी होईन बाबा
तेव्हा मी ही आणीन
तुला खाऊचा डबा

तुझी आणि माझी
अशीच राहिल ना दोस्ती
शेवट पर्यंत आपण दोघं
करू या खूप मस्ती

सौ.जया नेरे

Tuesday, 7 April 2020

बालकविता-आला उन्हाळा

आला उन्हाळा

आला आला उन्हाळा,
तब्बेतीला सांभाळा,
पाणी प्या भरपूर,
उन्हात जाणे टाळा....

लिंबू,चिंच,कोकम शरबत,
अन् पन्हं प्या कैरीचे,
झळ लागेल तुम्हा,
चटके झेलू नका ऊन्हाचे,..

करा डोळ्यांचे रक्षण,
रुमालाचा करा वापर,
घर ठेवा थंड तुम्ही ,
वाळ्याचा करा वापर...

रसदार फळांचे सेवन,
हलके फुलके करा जेवण,
शिळे अन्न खाऊ नका,
आरोग्याचे करा जतन...

उष्माघात होईल जेव्हा,
भिती असेल कोमाची,
आपल्या प्रमाणेच घ्यावी,
काळजी जनावरांची,

रक्तातील पाणी घटू नये,
पाणी प्यावे भरपुर,
काळजी घ्यावी सर्वांनी,
संपेल जीवन नाहीतर....

सौ.जया नेरे..
नवापुर जि.नंदुरबार
(आनंद झुला या माझ्या बालकाव्यसंग्रहातून)

कविता- कोराना

कोरोना

सांग देवराया आता
कधी मिटेल कोरोना
सुट्टी नको शाळा हवी
नको मुलांची वल्गना

घरी बसून बसून
झाले सारे रे बेजार
काम नाही धंदा नाही
दिला पोटावर मार

बोल नाही चाल नाही
सारे झाले गप गार
जणू सृष्टीला लागला
असा कसा हा आजार

हात धुवा,मास्क बांधा
योग्य ठेवा हो अंतर
संसर्गाने झाला तर
कसे जगावे नंतर

दर वर्षाला भोवतो
निसर्गाचा कसा कोप
अरे आतातर आहे
विदेशींचा हा प्रताप

त्रास नको कष्ट नको
नको कोणते संकट
नको विपत्ती कोणती
नको मानवाचा कट

सेवा डॉक्टरांची मिळे
मिळे पोलीस रक्षण
जीव ठेवून गहाण
जपे आम्हा रात्रंदिन

सौ.जया नेरे
नवापूर जि.नंदुरबार


Wednesday, 26 February 2020

माय मराठी

*मराठी राजभाषा दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...!*

    माय मराठी

माझ्या मराठी मातीत
शब्द पिक अंकुरते
रानोमाळी ती फुलते
रास शब्दांची भरते...

            कधी बोलते वृत्तात
            कधी अंलकारी होते
            ओव्या भारुडे मांडते
            किर्ती अभंगात गाते...

घेते निसर्ग कुशीत
पान,फुलांशी बोलते
शब्द सरीत भिजते
प्रेम सागरी डुंबते...

           वाणी तुकोबांची होते
           वेद ज्ञानाचे वदते
           भाव मनीचे खोलते
           अंतराचे दुःख नेते...

गोडी मराठी मायेची
माणूसकी ही जपते
वाट प्रेमाची दाविते
मान मराठीस देते.....


सौ.जया नेरे
नवापूर जि.नंदुरबार

Sunday, 23 February 2020

कविता- शब्दच कुठे उरतात....

शब्दच कुठे उरतात...

शब्दच कुठे उरतात गीतात तिला मांडतांना
शब्द कुठे उरतात व्यथेस तिच्या सांगतांना

नसती ती जर जग हे सुंदर पाहिले नसते
नसती ती तर जीवन माझे फुलले नसते

उपाशी राहुनी दिला आम्हा मुखी घास
रात्र रात्र जागुन तिने भोगला खूप त्रास

खडतर जीवन जगतांनाही हसत राही
आयुष्याचे गणित एकटी सोडून पाही

शब्दच कुठे उरतात तिला स्मरतांनाही
संस्काराची ओंजळ रिती भरतांनाही

सौ.जया नेरे

Thursday, 20 February 2020

कविता- शिवमुनी

महाशिवरात्रीच्या सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा...!     

शिवमुनी
करूनी सुखाचा त्याग
फिरलास रानोमाळ
फासुनी भस्म अंगाला
घातली नागोबांची माळ

अंगार मनाचा दूर करण्या
शिरावर वाहते गंगामाय
वल्कलांनी झाकली काया
मनात कुठला हव्यास नाय

अमृताचे करूनी दान
विषास स्वतः केले प्राशन
मंत्र दिधला जगण्याचा
ठेवावे नित्य संयमी मन

आली संकटे किती जरी
हार ना मानावी कुणी
पचवावे अपयशास सदा
सांगे सर्वास हा शिव मुनी

सौ.जया नेरे

Tuesday, 18 February 2020

काव्यरचना - शिवबा


शिवबा
स्मरावा शिवबा
घडावा शिवबा
जगावा शिवबा
गावा ही शिवबा
किल्ला शिवनेरी
जन्मला शिवबा
दिले असे रत्न
जिजा माँ साहेबा
ऐकविल्या कथा
स्वप्न जागविले
युध्दनितीचे ते
धडे गिरविले
मावळे सोबती
लढला गनिमी
घेतली तयांनी
स्वराज्याची हमी
तरबेज बुध्दी
करारी तो बाणा
शिस्त रयतेला
शत्रूस निशाणा
यावे पुन्हा जन्मा
नांदावी समता
द्यावी शिकवण
मिटावी शत्रूता

सौ.जया नेरे
नवापूर जि.नंदुरबार

बघा शिवबा होता येतय का ?- काव्यरचना

बघा शिवबा होता येतय का?

खरचं शिवबाचा आदर करताय
तर शिवबाचे विचार स्विकारा
त्यांचे आचार अंगिकारा
शिवमय होऊ द्या देह सारा
बघा शिवबा होऊन जगता येतय का?

खरचं शिवबाचा आदर करताय
तर प्रत्येक नारीचा सन्मान करा
तिच्या रक्षणाची जबाबदारी स्विकारा
अत्याचारापासून तिला मुक्त करा
बघा शिवबा होऊन जगता येतय का?

खरचं शिवबाचा आदर करताय
तर समता मनामनात ठसवा
प्रत्येक जनमाणसात समानता रुजवा
मतभेदांचे काहूर विझवा
बघा शिवबा होऊन जगता येतय का?

खरचं शिवबाचा आदर करताय
तर स्वराज्य रक्षणाचा विडा उचला
जसा माझ्या शिवबाने इतिहास रचला
गनिमीने शत्रूवर वचक बसला
बघा शिवबा होऊन जगता येतय का?

घराघरात शिवबा झाला पाहिजे
वाईटाचा नाश केलाच पाहिजे
भारतमातेस न्याय दिला पाहिजे
बघा शिवबा होऊन जगता येतय का?

निळा,पिवळा,हिरवा,भगवा
याचे मर्म तुम्ही जाना
त्यांचे विचार आचारणात आणा
तेव्हाच यांचा तुम्ही जयजयकार म्हणा
बघा शिवबा होऊन जगता येतेय का?

जय भवानी,जय शिवराय...!

सौ.जया नेरे

Thursday, 13 February 2020

कविता- भारतमाता रडते आहे.....पुलवामा हल्ला



भारतमाता रडते आहे

विपरीत सारे घडते आहे
बघून भारत माता रडते आहे...

सुरक्षेसाठी झगडत असता
बलिदान वीरांचे होते आहे
बघून भारत माता रडते आहे....

दुश्मनांना कसा ना पाझर फुटला
चित्कारांनी आसमंत फुटते आहे
बघुन भारत माता रडते आहे....

घर संसार आणि सारेच लुटले
प्रत्येकाचे काळीज तुटते आहे
बघुन भारत माता रडते आहे.....

हे माते तुझ्या वीर सुपूतांचे रक्त
तुझ्याच शिरावर उडते आहे
बघून भारत माता रडते आहे....

छिन्नविछिन्न हे शरीर तयांचे
यातनांनी कसे तडफडते आहे
बघून भारतमाता रडते आहे....

निष्पाप जिवांची होळी केली
पाहुनी हृदय हे जळते आहे
बघून भारतमाता रडते आहे....

माणुसकीशी आपुले नाते
तेच तर आता नडते आहे
बघून भारतमाता रडते आहे....

चिरडून टाक तू दुश्मनांस या
कशास आता डगमगते आहे
बघून भारतमाता रडते आहे...

सौ.जया नेरे
नवापूर जि.नंदुरबार


Wednesday, 12 February 2020

बालकविता- रानमेवा

रानमेवा

स्नेहा आणि सुमित
खुशीत होती आज
कारण जाणार होती
त्यांची सहल जंगलात

निघाले सारेच मुलं
जंगलाच्या वाटेने
चिंचा,बोर,आवळे
दिसली रस्त्याच्या कडेने

दगड आणि काठ्यांनी
सगळ्यांची केली शिकार
चटक मटक खाल्ले
झाला जीव गारे गार

पुढे दिसले झाड
हिरव्या लाल आकड्यांचे
अरे ही तर इंग्रजी चिंच
लक्ष गेले सगळ्यांचे

जांभुळ आणि करवंदांची
दिसली त्यांना जाळी
खायचे होते सगळ्यांना
रानाची ही मैना काळी

रानमेवा खाण्यात तर
होते सारेच धुंद
याहून दुसरा नाही
जगण्यातील आनंद

सौ.जया नेरे

Monday, 10 February 2020

बालकविता- टेडिबिअर


टेडिबिअर

खेळण्यासाठी हवा
टेडिबिअर नवा
आई बाबा आणि मी
दुजा कुणी हवा

अॉफिस जातात बाबा
आई जाते कामाला
एकटीच असते घरात
नसते कुणी बोलायला

झोपतांनाही माझ्यासोबत
टेडिबिअर असतो
अंगाईचा सूर मग
त्याच्या कानी वाजतो

त्याच्या शिवाय कधी माझे
जेवण होत नाही
बसतो दोघ गपशप करत
वेळ सहज निघून जाई

एवढा मोठा बंगला त्यात
फक्त आम्ही दोघं
आजी बाबा काका काकू
गावी असतात चौघं

गोष्ट कुणी सांगत नाही
जेवू घालत नाही कुणी
काऊचिऊचा घास आणि
संपत चालली रूढी जुनी

टेडिबिअरच आहे केवळ
माझा दोस्त खरा
एकाकी या जीवनाचा
तोच तर आहे आसरा

सौ.जया नेरे









Sunday, 9 February 2020

बालकविता-चॉकलेट


चॉकलेट
चॉकलेट आणि मुलांचे
असते गोड नाते
रडले मुल रूसले मुल
चॉकलेट हातात येते

शाळेत जातांना हट्ट होतो
चॉकलेटसाठी खास
बाबा म्हणतात चॉकलेट देईन
झालास जर पास

चॉकलेटचा डब्बा जेव्हा
येतो चिंटूच्या घरी
आली असेल नक्कीच आता
आजी आजोबांची फेरी

वाढदिवसाला चॉकलेटची
असते मेजवाणी
प्रत्येक जण येतांना
चॉकलेट घरी आणी

चॉकलेटने दात किडतात
म्हणतात डॉक्टर अंकल
चॉकलेट खाण्यासाठी मग
लढवू कोणती शक्कल

कॕडबरी तर आहे बघा
चॉकलेटची माय
यासाठीच तर चॉकलेट डे
प्रिय झाला हाय

सौ.जया नेरे





Wednesday, 5 February 2020

बालकविता- प्राण्यांची सहल

सहल
जंगलातील प्राण्यांची जाणार होती सहल
कुठे आणि कसे जायचे करत बसले खल

समुद्राच्या सफरीचे केले त्यांनी नियोजन
प्रत्येकाने वाटून घेतले आणायचे भोजन

मुळा,गाजर,शेंगा,बोरे सर्वांनीच जमवले
जो तो जागा सांभाळत बोटीवर जाऊन बसले

मोराच्या तालावर हत्तीदादा नाचत होते
ससा आणि कासव तबलापेटी वाजवत होते

गार गार पाण्याने भरली सा-यांना थंडी
कुडकुड करत सर्वांनी घातली अंगावर बंडी

आणलेल्या भोजनावर मारला त्यांनी ताव
कळत नव्हते कुणालाही चालतेय कशी नाव

समुद्रातील सहलीने मने त्यांची आनंदली
भांडणतंटा विसरून मौजमस्तीत दंगली

सौ.जया नेरे

Friday, 17 January 2020

कविता-रानप-या

रानप-या
रानावनात राहणाऱ्या
माती चिखलात खेळणा-या
काटेकुटे तुडवणा-या
आहोत आम्ही रानप-या

लागत नाही आम्हास
थंडी ऊन वारा
झेलतो अंगावर
पावसाचा मारा
देह तापतो चटक्यांनी सारा
अशा आहोत आम्ही
रानावनात राहणाऱ्या रानप-या

तेलकट तिखटाचा नसतो
जेवणात मारा
तुकतुकीत कांतीचा असतो
आमचा चेहरा
स्नो,पावडरला नसतो
कुठेही थारा
अशा आहोत आम्ही
रानावनात राहणाऱ्या रानप-या

काटक,संयमी
अशी आमची ख्याती
खेळण्यात तरबेज
चपळतेची आमची महती
थकत नाही,झुकत नाही
निर्मलतेचा आमच्यात
वाहतो झरा
अशा आहोत आम्ही
रानात राहणाऱ्या रानप-या


सौ.जया नेरे

बालकविता-कडाक्याची थंडी



कडाक्याची थंडी
जंगलात पडली कडाक्याची थंडी
कोल्होबाने घातली लोकरी बंडी
वाघोबाने ओढली कश्मिरी शाल
माकडाचे तर झाले पुरते हाल
मोराने सप्तरंगी ओढली रजई
बगळ्याने कापसाची घेतली दुलई
हत्तीने घातला काळाकुट्ट कोट
सश्याचे तर सगळे फुटले ओठ
जंगलाचा कारभार करणार कसा?
थंडीत प्रत्येकाचा बसला होता घसा
शेकोटीभोवती सारे बसले येवून
तिथेच सभेचे विषय टाकले घेवून
थंडी जाण्याची पाहू लागले वाट
जाणार कधी ही हुडहुडीची लाट
सौ.जया नेरे
नवापूर जि.नंदुरबार
9423918363

Wednesday, 15 January 2020

बालकविता-तिळगुळ

तिळगुळ

तिळाची आणि गुळाची
झाली आता मैत्री
लोळले पोळले खेळलेत
कढईत रात्री

शेंगदाण्याने मारली
कढईत उडी
गडबडा लोळून छान
तयार झाली पापडी

चिंटूचे तर सारेच आता
स्वयंपाक घरात लक्ष
डबा वाजणार नाही
यासाठी रहावे का दक्ष?

गुळाच्या खमंग वासाने
परिसर दळवळला
प्रत्येकालाच लाडू मग
खावासा वाटला

तीळ आणि गुळाचे
थंडीशी आहे नाते
स्नेह आणि माधुरता
नात्यात टिकवू पहाते

भांडण तंटा नकोच
प्रेम हृदयात साठवू या
भेदभाव विसरून सारे
क्षण सुखाचे आठवू या

सौ.जया नेरे
नवापूर जि.नंदुरबार
9423918363

कविता-तिळगुळ

तिळगुळ

तीळ आणि गुळाची
होते जेव्हा भेट
विसरून जातात भांडण सारे
होते तयात समेट

स्निग्ध अन् माधुर्याचा
होतो येथे मेळ
नात्यातील जवळीकतेची
हीच तर असते वेळ

प्रेमाची उधळण करत
येत असतो तीळ
मनामनात नसतो त्यांच्या
तिढा आणि पीळ

तिळगुळाचा वाण
देऊ संक्रात सणाला
कटु आठवांना सारून
गोडवा येईल मनाला

नववर्षातील पहिला सण
मान तुला हा पहिला
सद्गुणांचा अमोल ठेवा
युगानुयुगे चालत राहिला

सौ.जया नेरे

Saturday, 11 January 2020

बालकविता-पतंग

पतंग

रंगीबेरंगी पतंगांनी
भरले होते आकाश
आकाशातील सूर्याचा
झाकला गेला प्रकाश

सूर्यालाही कळले नाही
नेमके काय झाले
पतंगांच्या रंगानी तर
आभाळ पूर्ण न्हाले

हळूच त्यातून एक लाल
पतंग बोलू लागले
शर्यतीचा त्यांचा बेत
सूर्यास खोलू लागले

सूर्य आणि त्यांचा आता
बसला छान मेळ
आपसातील शर्यतीचा
मग सुरू झाला खेळ

कोण जिंकेल कोण हरेल
सारे बोलू लागले
पाखरांच्या गाण्यावर
तालात डोलू लागले

पतंगांना साथ देण्या
वारा तिथे आला
झाड वेलींनी तर
फांद्यांचा टाळ केला

पतंगांनी वाढवली होती
आकाशाची शोभा
सूर्यालाही कळले नाही
संपली कधी प्रभा

सौ.जया नेरे
नवापूर जि.नंदुरबार